Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, UP POLICE
39 मिनिटांपूर्वी
मेघालयचा ईस्ट खासी हिल्स जिल्हा उत्तर प्रदेशमधील गाझीपूर जिल्ह्यापासून एक हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर आहे.
ईस्ट खासी हिल्स जिल्ह्यात 2 जून रोजी इंदूरच्या राजा रघुवंशी यांचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर एक आठवड्यानंतर त्यांची बेपत्ता पत्नी सोनम रघुवंशी उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये सापडली.
या प्रकरणी मेघालय, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या तिन्ही राज्यांचे पोलीस वेगवेगळे दावे करत आहेत.
इंदूरचे असलेले राजा आणि सोनम हनिमूनसाठी मेघालयला गेले होते आणि नंतर दोघेही बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. सध्या सोनम रघुवंशी पोलीस कोठडीत आहेत. मेघालय पोलिसांनी त्यांच्यावर ‘हत्येमध्ये सहभागी’ असल्याचा आरोप केला आहे, पण सोनमचे नातेवाईक ती ‘निर्दोष’ असल्याचं म्हणत आहेत.
राजा रघुवंशी 23 मे 2025 पासून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह 2 जून 2025 रोजी मेघालयच्या ईस्ट खासी हिल्स जिल्ह्यातील वेइसाडोंग धबधब्याजवळ 150 फूट खोल दरीत सापडला होता.
या प्रकरणात काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.
उदाहरणार्थ – सोनम इतक्या लांब मेघालयहून यूपीच्या गाझीपूरमध्ये कशी पोहोचली? पोलीस तिच्यापर्यंत कशासाठी पोहोचले?
मेघालय पोलीस सध्या सोनमला अटक करण्याच्या तयारीत आहे.
या हत्येमध्ये सोनमचा काही सहभाग आहे का?
ईस्ट खासी हिल्सचे पोलीस अधीक्षक विवेक स्येंम यांनी पत्रकारांना सांगितले, “एकदा आमची टीम तिथे (गाझीपूर) पोहोचली की, ती तिला अटक करेल आणि ट्रांझिट रिमांड घेईल.”
यूपी पोलिसांनीही सोनमला मेघालय पोलिसांकडे सोपवण्याची तयारी दर्शवली आहे.
या प्रश्नावर एसपी विवेक स्येंम म्हणतात, “हो, तसं वाटतंय. मेघालय पोलिसांच्या दोन टीम मध्य प्रदेशमध्ये आहेत आणि एक टीम सोनमला अटक करण्यासाठी उत्तर प्रदेशला जात आहे.”
सोनमचे वडील देवी सिंह यांनी मेघालय पोलिसांवर ‘दिशाभूल करण्याचा’ आरोप करत आपली मुलगी ‘निर्दोष’ असल्याचं सांगितलं आहे.
दुसरीकडे, मेघालय पोलिसांचा दावा आहे की, जेव्हा या प्रकरणात ‘इतर तीन लोकांना अटक झाली’ तेव्हा सोनम ‘समोर आली’ आणि हेच सर्व काही स्पष्ट करतं.
सोनम रघुवंशीच्या नातेवाईकांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सोनमपर्यंत पोलीस कसे पोहोचले?
गेल्या 17 दिवसांपासून सोनम रघुवंशीचा शोध सुरू होता. राजा यांच्या मृतदेहाजवळ लाल व काळ्या रंगाचा रेनकोट सापडला होता. या रेनकोटच्या आधारे आणि हॉटेलबाहेरील सीसीटीव्ही फुटेजमधून सोनमबद्दल काही माहिती मिळत होती.
सोनमचे वडील देवी सिंह यांनी सांगितले की, “8 जूनच्या रात्री उशिरा सोनमचा भाऊ गोविंद सिंहला उत्तर प्रदेशातून फोन आला. सोनमने गाझीपूरच्या एका ढाब्यावरून फोन केला होता. त्यानंतर आम्ही पोलिसांना माहिती दिली. ढाब्यावरून पोलीस तिला घेऊन गेले. ही घटना दोन वाजण्याच्या सुमारास घडली आणि फक्त गोविंदशीच माझी मुलगी बोलली.”
गाझीपूरच्या नंदगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर काशी ढाबा आहे. गाझीपूर पोलिसांनी सांगितले की, त्यांनी सोनमला अटक केली आहे.
गाझीपूरचे पोलीस अधीक्षक डॉ. इराज राजा यांनी पत्रकारांना सांगितले, “फोन केल्यानंतर सोनमच्या नातेवाईकांनी मध्य प्रदेश पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर एमपी पोलिसांनी गाझीपूर पोलिसांशी संपर्क साधला आणि मग सोनमला ढाब्यावरून घेऊन वन स्टॉप सेंटरमध्ये नेले गेले.”

फोटो स्रोत, BBC/Vishnukant Tiwari
काशी ढाब्याचे मालक साहिल यादव यांचा दावा आहे की, त्यांनी स्थानिक पोलिसांना सूचना दिली होती.
माध्यमांशी बोलताना साहिल यादव यांनी म्हटलं की, “सोनमने तिच्या नातेवाईकांना फोन करण्यासाठी माझा फोन मागितला होता. फोनवर बोलताना ती रडू लागली. काही वेळानंतर तिच्या भावाने मला फोन केला आणि पोलिसांना सांगायला सांगितले. पोलीस आले आणि रात्री अडीचच्या सुमारास तिला घेऊन गेले.”
साहिल यांचे म्हणणे आहे की, जेव्हा त्यांनी सोनमला ती येथे कशी पोहोचली असं विचारलं. तेव्हा तिने काही उत्तर दिले नाही.
इंदूरचे पोलीस उपायुक्त (क्राईम) राजेश दंडोतिया यांनी बीबीसीला सांगितले, “शिलाँग पोलिसांकडून काल रात्री (8 जून) माहिती मिळाली की गाझीपूर पोलिसांनी सोनम रघुवंशीला शोधून काढले आहे. शिलाँग पोलिसांनी इंदूर पोलिसांशी संपर्क साधला होता आणि तिघांना संशयित म्हटले गेले. इंदूर व शिलाँग पोलिसांनी संयुक्त मोहिम राबवून तिघांना ताब्यात घेतले आहे.”
आता शिलाँग पोलीस या तिघांची चौकशी करत आहेत.
मेघालयचे डीजीपी आय नोंगरांग यांनी पीटीआयला सांगितले की, “इंदूरच्या व्यक्तीच्या हत्येच्या प्रकरणात चार लोकांना अटक करण्यात आली आहे, त्यामध्ये पत्नीचाही समावेश आहे. हनिमूनदरम्यान पत्नीनेच कथितरीत्या हत्या करण्याचा कट रचला आणि हे कृत्य पार पाडण्यासाठी इतर लोकांची मदत घेतली होती.”
मेघालय सरकार अडचणीत आणतंय – सोनमचे वडील
सोनम रघुवंशीचे वडील देवी सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “माझी मुलगी सोनम रघुवंशी निर्दोष आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ती असे काही करू शकत नाही.”
ते पुढे म्हणाले, “दोन्ही कुटुंबांच्या आणि दोन्ही मुलांच्या संमतीने लग्न झाले होते. पहिल्याच दिवसापासून मेघालय सरकार खोटं बोलत आहे. गाझीपूरला जाऊन माझ्या मुलीने ढाब्यावरून स्वतः फोन केला. पोलिसांनी तिला तिथूनच नेलं. मी अजून सोनमशी बोललेलो नाही.”
देवी सिंह यांनी पुढे म्हटलं की, “मुलगी खून का करेल? जर असं काही असतं तर ती फिरायला का गेली असती? माझी अमित शाह यांना विनंती आहे की, या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी. मेघालय पोलिसांनी एक बनाव तयार केला आहे.”

फोटो स्रोत, BBC/Vishnukant Tiwari
राजा यांचा मृतदेह सापडल्यानंतर त्यांच्या घराबाहेर ‘सोनम रघुवंशी की यही पुकार, कब देखेंगे घर का द्वार’ असं लिहिलेला फलक लावण्यात आला होता.
आता सोनमचं नाव समोर आल्यानंतर मात्रा राजा यांच्या कुटुंबीयांमध्ये स्पष्ट राग दिसत आहे. मेघालय पोलिसांच्या दाव्यानंतर त्यांनी सोनमचे फोटो जाळून आपला संताप व्यक्त केला.
बीबीसीशी बोलताना राजा यांच्या आई उमा रघुवंशी म्हणाल्या, “दोन्ही कुटुंबांत सर्व काही संमतीने झाले होते. दोघेही आनंदी होते. लग्नानंतर सोनम आमच्यासोबत ज्यापद्धतीने राहिली ते पाहून ती नवीन आहे, असं वाटत नव्हते. आम्हाला अजूनही विश्वास बसत नाही की सोनम असे काही करू शकते.”
राजा यांचे भाऊ विपिन रघुवंशी म्हणाले, “सर्वकाही चांगले होते. पण आम्ही आमचा भाऊ गमावला. जो दोषी असेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे.”
राज्याचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करू – मेघालय पोलीस
मेघालय पोलिसांचे म्हणणे आहे की, या गुन्ह्यानंतर सोशल मीडियावर राज्याविरुद्ध द्वेषपूर्ण पोस्ट केल्या गेल्या, ज्यामुळे राज्यातील जनतेचा अपमान झाला.
या प्रकरणाबाबत सोमवारी (9 जून) पत्रकार परिषद घेण्यात आली, ज्यात राज्याचे गृहमंत्री प्रेस्टोन टिनसॉन्ग व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
एका प्रश्नाच्या उत्तरात पोलीस अधिकारी म्हणाले, “राज्याच्या जनतेला लक्ष करून केलेल्या द्वेषपूर्ण सोशल मीडिया पोस्ट्सवर स्वतःहून दखल घेतली गेली आहे. जबाबदार व्यक्तींवर एफआयआर दाखल केली जात आहे.”

फोटो स्रोत, Sameer Khan/BBC Hindi
गृहमंत्री टिनसॉन्ग यांनी विनंती केली की, मेघालयविरोधात ‘नकारात्मक कथा’ निर्माण करू नका.
त्यांनी म्हटलं, “मी भारतात आणि भारताबाहेर असलेल्या सर्व लोकांना विनंती करतो की, कृपया मेघालयविषयी नकारात्मक प्रतिमा निर्माण करू नका. मग ती सोशल मीडियावर असो किंवा मुख्य प्रवाहातील मीडियामध्ये. कारण यामध्ये काही तथ्य नाही. मेघालय सुरक्षित आहे.”
या कारवाईला मेघालय सरकारने सांप्रदायिक दंग्यांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचे उदाहरण म्हटले आहे.
नेमकं काय घडलं होतं?
इंदूरच्या साकार नगरमध्ये राहणारे 29 वर्षीय राजा रघुवंशी आणि 27 वर्षीय सोनम हनिमूनसाठी मेघालयला गेले होते. पण 23 मे रोजी दोघेही बेपत्ता झाले.
11 दिवसांनी 2 जून रोजी ईस्ट खासी हिल्स जिल्ह्यातील वेइसाडोंग फॉल्सजवळ 150 फूट खोल दरीत राजा यांचा मृतदेह सापडला, पण सोनम अद्याप बेपत्ता होती.
राजा रघुवंशी यांचा मृतदेह 4 जून रोजी संध्याकाळी मेघालयहून त्यांच्या घरी पोहोचवण्यात आला.

फोटो स्रोत, Sameer Khan/BBC Hindi
ते 23 मे रोजी बेपत्ता होण्याच्या एक दिवस आधी नोंग्रियाटमध्ये पोहोचले होते आणि शेवटचं त्यांना शिपारा होमस्टेमधून चेकआऊट करताना पाहिलं गेलं होतं.
पोलीस स्थानिक लोकांशी व टूरिस्ट गाईड्ससोबत चौकशी करत होते, पण काहीही धागादोरे मिळत नव्हते.
त्या वेळी ईस्ट खासी हिल्स जिल्ह्याचे एसपी विवेक स्येंम यांनी बीबीसी हिंदीला सांगितले होते, “हा खून असल्याबद्दल शंका नाही. आम्हाला घटनास्थळी वापरला गेलेला एक ‘दाओ’ (मोठं धारदार चाकू) सापडला आहे.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC