Home LATEST NEWS ताजी बातमी शुबमन गिलची विराट कोहलीशी तुलना किती योग्य? काय आहेत जमेच्या आणि कमकुवत...

शुबमन गिलची विराट कोहलीशी तुलना किती योग्य? काय आहेत जमेच्या आणि कमकुवत बाजू?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

कसोटी सामन्यात कर्णधारपदाचा विचार करता टायगर पतौडी, सचिन तेंडुलकर, कपिल देव आणि रवि शास्त्री यांच्यानंतर शुबमन गिल (उजवीकडे) हा पाचवा सर्वात तरुण खेळाडू ठरणार आहे

फोटो स्रोत, Getty Images

क्रिकेटर शुबमन गिलची आजच्या परिस्थितीत विराट कोहलीशी तुलना केल्यास ती कदाचित योग्य वाटणार नाही. मात्र 2014 मध्ये महेंद्र सिंह धोनीनं अचानक निवृत्ती जाहीर केल्यानंतर विराट कोहलीकडे कसोटी संघाचं कर्णधारपद आलं होतं. त्या गोष्टीशी जर आपण तुलना केली तर मुद्दा लक्षात येईल.

2014 मध्ये विराट कोहलीवर जेव्हा कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आली होती, तेव्हा विराटनं तोपर्यंत 29 कसोटी सामन्यांमध्ये 1,855 धावा काढल्या होत्या.

यात सहा शतकं आणि नऊ अर्धशतकांचा समावेश होता. विराट कोहलीची धावांची सरासरी तेव्हा 39.46 ची होती. तर त्याच वय होतं फक्त 26 वर्षे.

शुबमन गिल 20 जूनला भारताकडून नाणेफेकीसाठी हेडिंग्लेच्या मैदानात उतरेल तेव्हा त्याचं वय 25 वर्षे आणि 285 दिवस असेल.

कर्णधारपदाचा विचार करता टायगर पतौडी, सचिन तेंडुलकर, कपिल देव आणि रवी शास्त्री (ते फक्त एक कसोटी सामन्यात कर्णधार होते) यांच्यानंतर शुबमन गिल हा पाचवा सर्वात तरुण खेळाडू ठरणार आहे.

शुबमन गिल आतापर्यंत 32 कसोटी सामने खेळला आहे. यात त्यानं 1,893 धावा काढल्या आहेत. यात पाच शतकं आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. शुबमन गिलनं 35.05 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत.

विराट कोहलीनं 2011 मध्ये एकदिवस सामन्यांमध्ये दबदबा निर्माण केला. मात्र कसोटी संघाच्या कर्णधारपदामुळे विराटला महान क्रिकेटपटू बनता आलं.

विराट कोहलीनं सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. विराटचं हे यश शुबमन गिलनं पाहिलं आहे.

शुबमनला हे माहिती आहे की, जर त्याला भारतीय संघाचा चांगला कर्णधार व्हायचं असेल तर सर्वात आधी त्याला कसोटी क्रिकेटचं आव्हान पेलावं लागेल.

गिलकडे त्यासाठी वेळही आहे. कारण अजून तो खूप तरुण आहे. 2014 मध्ये विराट कोहलीच्या बाबतीतही तसंच होतं.

आयपीएलच्या गेल्या दोन मोसमांपासून शुभमन गिल गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे

फोटो स्रोत, Getty Images

तसं तर, शुबमन गिलला फक्त इंग्लंडच्या दौऱ्यासाठी कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मात्र, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर म्हणाले आहेत की, “एक किंवा दोन दौऱ्यांसाठी कर्णधाराची निवड करत नसतात. आम्हाला भविष्याचा विचार करून कर्णधार निवडायचा आहे.”

इंग्लंड दौऱ्याबरोबरच दोन वर्षे चालणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील भारतीय संघाचा प्रवासही सुरू होईल.

एकप्रकारे पाहिलं तर शुबमन गिलला खोल समुद्रात उतरवलं आहे. त्यात पोहण्याचं आव्हान पेलू शकतो की नाही, हे आता पाहिलं जाणार आहे.

प्रत्येक कर्णधार वेगवेगळा असतो. शुबमन गिलचं व्यक्तिमत्वं वेगळं आहे. विराट कोहलीचा आक्रमकपणा किंवा रोहित शर्माप्रमाणे सहजपणे खेळण्याचा दृष्टीकोन यापेक्षा गिलचा खेळ वेगळ्या प्रकारचा आहे.

गिलमध्ये विराट आणि रोहित या दोघांचीही काही वैशिष्ट्ये दिसतात. शुबमन, रोहितप्रमाणे शांत राहून आणि कोहलीप्रमाणे सजग राहून खेळतो.

आयपीएलमधील गिलचं कर्णधारपद

भारतीय कसोटी संघात बदल होण्याचा हा काळ आहे. अशावेळी निवड समितीनं शुबमन गिलच्या फलंदाजीच्या कौशल्याव्यतिरिक्त त्याच्यातील आणखी एका गुणाची दखल घेतली आहे. तो म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वातील ‘स्थैर्य’.

तसं तर टी-20 क्रिकेटमध्ये मिळालेल्या यशाची तुलना कसोटी क्रिकेटशी करणं योग्य ठरणार नाही. मात्र टी-20 मध्ये कर्णधार प्रत्येक चेंडूवर व्यक्त होतो, त्यावर प्रतिक्रिया देतो. यातून त्यांच्यावर असलेला दबाव आणि त्या दबावाखाली करावी लागणारी कामगिरी याची झलक नक्कीच दिसते.

गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून शुबमन गिलचा हा आयपीएलचा दुसरा मोसम होता.

मात्र, के. एल. राहुल, संजू सॅमसन आणि ऋषभ पंत यांच्या विपरित कर्णधारपदामुळे गिलच्या फलंदाजीवर कोणताही नकारात्मक परिणाम दिसून आला नाही.

यावर्षी गुजरात टायटन्स या संघावर शुबमननं फक्त नियंत्रणच ठेवलं नाही, तर विजय आणि पराभव दोन्हीतही संयम आणि प्रगल्भपणा दाखवला.

ग्राफिक्स

क्रिकेटमधील सर्वात अवघड फॉरमॅट असलेल्या कसोटी क्रिकेटमध्ये शुबमन गिलची खरी परीक्षा होणार आहे.

आयपीएलमध्ये यश मिळालेलं असूनदेखील शुबमन गिल एखाद्या जुन्या काळातील क्रिकेटपटूप्रमाणे वाटतो. दाढी-मिशा नसलेला आणि टॅटूदेखील लपवलेला, असा काहीसा शुबमन आहे.

मात्र, कॅमेरा बंद झाल्यानंतर त्याची बॅट बोलू लागते. गेल्या बॉर्डर-गावस्कर चषकात शुबमन गिल पाचपैकी फक्त तीन कसोटी सामने खेळला होता.

रोहित शर्मानं जेव्हा सिडनी कसोटीत (शेवटचा कसोटी सामना) न खेळण्याचा निर्णय घेतला तेव्हा गिलला शेवटच्या अकरा खेळाडूंमध्ये (प्लेईंग इलेव्हन) स्थान मिळालं होतं.

शुबमन गिल, शेवटच्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावांमध्ये झटपट बाद झाला होता. पहिल्या डावात जेवणाच्या वेळेच्या आधीच नाथन लायननं त्याच्या फिरकीच्या जाळ्यात गिलला ओढलं आणि दुसऱ्या डावात मध्यमगती गोलंदाज ब्यू वेबस्टरनं गिलला बाद केलं होतं.

त्याच्या चार महिन्यांनी शुबमन गिलला मिळालेलं कसोटी संघाचं कर्णधारपद हा एखाद्या खेळाडूचं करियरच नाही तर भारतीय क्रिकेटला नवी दिशा देणारा निर्णय ठरू शकतो.

भारतीय संघासमोरील चिंता

गिलला माहिती असेल की, इंग्लंडमध्ये त्याची कामगिरी चांगली झालेली नाही. सहा डावांमध्ये त्यानं 14.66 च्या सरासरीनं फक्त 88 धावा केल्या आहेत.

2014 मध्ये ज्याप्रमाणे कोहली एकाच फॉरमॅटचा कर्णधार होता, तसंच सध्या शुभमनच्या बाबतीतदेखील आहे

फोटो स्रोत, Getty Images

इंग्लंडमध्ये के. एल. राहुलनं 18 डावांमध्ये 34.11 च्या सरासरीनं 614 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.

तर उप-कर्णधार ऋषभ पंतनं 15 डावांमध्ये 34.06 च्या सरासरीनं 511 धावा केल्या आहेत. यात पंतनं दोन शतकं आणि दोन अर्धशतकं केली होती.

या दोघांव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला इंग्लंडमध्ये कसोटी सामन्याचा कोणताही अनुभव किंवा यश मिळालेलं नाही. त्यामुळे साहजिकच भारतीय संघाचे चाहते चिंताग्रस्त असतील.

शुबमन जमेच्या बाजू कोणत्या?

शुबमन आणि भारतीय संघ या दोघांच्याही संदर्भात दोन जमेच्या बाजू आहेत. शुबमन करियरच्या अशा टप्प्यावर आहे, जिथं अपेक्षा आणि दबाव फलंदाजाला पुढं जाण्यासाठी आणि स्वत:चा खेळ उंचावण्यासाठी प्रेरणा देतात. कोहलीच्या बाबतीतही असंच झालं होतं.

सध्या शुबमन, 2014 मधील विराट कोहलीप्रमाणेच फक्त एका फॉरमॅटचा कर्णधार आहे.

दुसरी गोष्ट अशी की, इंग्लंडमध्येही जिमी अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड सारखे महान वेगवान गोलंदाज निवृत्त झाल्यानंतर गोलंदाजीमध्ये बदल होण्याचा काळ आहे.

गिलसाठी मालिकेत सुरुवातीला सर्वात महत्त्वाची बाब असेल ती म्हणजे प्रशिक्षक गौतम गंभीरबरोबर त्याचा ताळमेळ.

रोहित आणि गंभीरमध्ये धागा जुळवण्यासाठी अभिषेक नायरचा संघ व्यवस्थापनात समावेश करण्यात आला होता, असं म्हटलं जायचं.

मात्र, आता नायर संघात नाही आणि गिलला गंभीरबरोबर ताळमेळ साधण्याचा मार्ग स्वत:च शोधावा लागेल.

मालिकेच्या सुरुवातीच्या काळात प्रशिक्षक गौतम गंभीरबरोबर ताळमेळ साधणं ही गिलसाठीची सर्वात महत्त्वाची बाब असेल

फोटो स्रोत, ANI

बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेत गंभीरचं व्यवस्थापन आणि निर्णय घेण्याची पद्धत पाहण्याची संधी शुबमन गिलला मिळणार आहे.

शुबमन गिलला हेदेखील माहिती असेल की, अपयशानंतर क्रिकेटमध्ये बदल होतात.

आधी कर्णधार हटवला जातो आणि नंतर प्रशिक्षक हटवला जातो. भारतानं आधीच्या दोन कसाटी मालिका गमावल्या आहेत.

या पराभवानंतर कर्णधार बदलले गेले आहेत आणि आता प्रशिक्षक असलेल्या गंभीरवर टांगती तलवार आहे.

सध्यातरी शुबमन गिलकडे कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याची एक चांगली संधी आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC