Home LATEST NEWS ताजी बातमी लालबहादूर शास्त्रींच्या एका हाकेवर लोकांनी सोडलं होतं एकवेळचं जेवण

लालबहादूर शास्त्रींच्या एका हाकेवर लोकांनी सोडलं होतं एकवेळचं जेवण

4
0

Source :- BBC INDIA NEWS

लाल बहादूर शास्त्री

  • Author, रोहन नामजोशी
  • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • 25 मार्च 2024

    अपडेटेड 4 तासांपूर्वी

(आजच्याच दिवशी, म्हणजे 9 जून 1964 रोजी लालबहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान बनले होते. या निमित्तानं वाचा बीबीसी मराठीच्या ‘गोष्ट पंतप्रधानांची’ मालिकेतील लेख.)

इतिहासातली काही माणसं त्यांची छाप वेगवेगळ्या कारणांनी सोडून जातात. भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचं व्यक्तिमत्त्व अशाच प्रकारचं होतं. ‘मूर्ती लहान पण कीर्ति महान’ या उक्तीचं मूर्त रूप म्हणजे लालबहादूर शास्त्री होत.

त्यांच्या नावाचे रस्ते भारतातल्या सर्व महत्त्वाच्या शहरात आहेत. महात्मा गांधी आणि त्यांची जयंती एकाच दिवशी येते. भारतातील तमाम सनदी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी अकादमी त्यांच्या नावाने ओळखली जाते. आधुनिक भारताच्या निर्माणात लालबहादूर शास्त्रींनी पंतप्रधान म्हणून अल्पकाळ का होईना पण चांगलीच छाप सोडली.

त्यांच्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीतल्या काही महत्त्वाच्या घटनांवर प्रकाश टाकू या.

नेहरूंचं निधन आणि ‘ती’ बातमी

1964 मध्ये जवाहरलाल नेहरूंचं निधन झालं. त्यांच्यावर अंत्यसंस्कार होण्याआधीच त्यांच्या उत्तराधिकाऱ्याविषयी चर्चा सुरू झाली होती. तेव्हा लालबहादूर शास्त्रींना बहुतांश मंत्र्यांचा पाठिंबा होता.

त्यावेळी शास्त्री बिनखात्याचे मंत्री होते.

गृहसचिव व्ही. विश्वनाथन यांना या परिस्थितीचा भयंकर तणाव आला आणि त्यांनी सर्व राज्य सरकारांना संदेश पाठवला की ‘दिल्लीत प्रचंड संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसंच सर्व सुरक्षा दलांनी खबरदारी बाळगावी आणि अप्रिय घटना टाळाव्यात.’

सैन्यातील सर्व लोकांना त्यांच्या सुट्टीवरून परत बोलवण्यात आलं.

लालबहादूर शास्त्री

जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचा कोणी एक उत्तराधिकारी नेमला नव्हता. तरी त्यांनी अशी एक राजकीय व्यवस्था तयार केली होती जी एखादा सक्षम नेता निवडेल आणि ही सर्व निवड प्रक्रिया सुरळीत पार पडेल.

नेहरूंच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मोरारजी देसाई यांच्या त्यागराज मार्गावरील घरात अनेक घडामोडी सुरू होत्या.

तिथे अनेक लोक जमले होते आणि त्यांचे दोन समर्थक तारकेश्वरी सिन्हा आणि त्यांचा मुलगा कांती देसाई यांच्याकडे एक यादी होती.

त्या यादीत मोरारजींना संसदेतील नेता निवडण्याविषयी एकतर सहमती किंवा असहमती दर्शवणाऱ्या नेत्यांची नावं होती. ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर मोरारजी देसाईंकडे गेले.

देसाई हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहे की नाही याची पडताळणी नय्यर यांना करायची होती.

नय्यर यांनी तत्कालीन घटनांचा उल्लेख त्यांचे पुस्तक ‘बियॉंड द लाइन्स’ या पुस्तकात केला आहे.

मोरारजी यांचे सुपुत्र कांती देसाई यांनी कुलदीप नय्यर यांना सांगितले की ‘काहीही झालं तरी मोरारजी या शर्यतीत आहे आणि ते नक्कीच जिंकणार. तुमच्या शास्त्रींना सांगा की लढू नका’. त्यावेळी कांती देसाई हे मोरारजी यांचे माहिती अधिकारी होते.

लालबहादूर शास्त्री

फोटो स्रोत, Lal Bahadur Shastri Memorial

या सर्व घडामोडी जेव्हा कुलदीप नय्यर शास्त्रींना सांगायला गेले तेव्हा ते म्हणाले की मला सर्व संमतीने पंतप्रधान व्हायचं आहे. पण तसं झालं नाही तर मी मोरारजींविरुद्ध लढायला तयार आहे कारण मी त्यांना हरवू शकतो. मात्र इंदिरा गांधींना हरवू शकत नाही.

तसंच त्यांच्या मते त्यावेळी जयप्रकाश नारायण हे पंतप्रधान पदाचे सर्वांत सक्षम उमेदवार होते. त्यानंतर कुलदीप नय्यर पुन्हा एकदा मोरारजी देसाईंकडे गेले आणि त्यांना शास्त्रींचं मत सांगितलं. त्यावर जयप्रकाश नारायण यांना देसाईंनी ‘गोंधळलेले व्यक्तिमत्व’ असं म्हटलं.

हे होत असतानाच कुलदीप नयर यांनी यु. एन. आय. मध्ये बातमी दिली की मोरारजी देसाई हे पंतप्रधान पदासाठी सर्वात इच्छुक आणि आघाडीचे उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे लालबहादूर शास्त्री हे सुद्धा पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत.

या बातमीमुळे मोरारजींचं नुकसान झाल्याचं कुलदीप नय्यर सांगतात. मोरारजींच्या समर्थकांनी कुलदीप नय्यर यांना सांगितलं की तुमच्या बातमीमुळे मोरार्जींचं किमान 100 मतांचं नुकसान झालं आहे. नेहरूंच्या अस्थी सुद्धा विसर्जित झाल्या नव्हत्या पण मोरारजी शड्डू ठोकून पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते अशी चर्चा त्यावेळी या बातमीमुळे झाली.

आपल्या बातमीमुळे प्रचंड नुकसान झाल्याची जाणीव नय्यर यांना झाली. तेव्हा शास्त्रींनी नय्यर यांना घरी बोलावलं आणि सांगितले की आता सामना संपला आहे.

असं झालं तरी मोरारजींना आयुष्यभर वाटत राहिलं की नय्यर यांनी ती बातमी मुद्दाम शास्त्रीजींच्या बाजूने दिली. जेव्हाही कधी नय्यर हा विषय मोरारजींकडे काढत तेव्हा मोरारजी म्हणत की ‘शास्त्रींकडे अशी कला होती की त्यांच्या माणसांना ते हवं तेव्हा आणि हवं तसं वापरत.’

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के कामराज यांनी जाहीर केलं की बहुमत हे शास्त्रींच्या बाजूने आहे. त्यांना संसदेत नेता म्हणून निवडलं आणि अशा प्रकारे लालबहादूर शास्त्री यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर शास्त्री यांना हृदयविकाराचा झटका आला. हा त्यांचा दुसरा झटका होता. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता.

तेव्हा शास्त्री म्हणाले की “मी जर एक-दोन वर्षांत मेलो तर पुढच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होतील आणि तीन-चार वर्षात जर मेलो तर पुढचे पंतप्रधान यशवंतराव चव्हाण होतील.”

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर भ्रष्टाचाराचा मुद्दा शास्त्रींनी उचलून धरला. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. संथनामन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्यांनी स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ला केंद्रीय अन्वेषण ब्युरो असं नाव दिलं. एस पी इ चा उद्देश सरकारी नोकरीत असलेल्या लोकांचा भ्रष्टाचार कमी करणे हा होता. मात्र याशिवाय अनेक आव्हानं शास्त्रींची वाट पाहत होते.

यशवंतराव चव्हाण आणि लाल बहादूर शास्त्री

फोटो स्रोत, Getty Images

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी

लालबहादूर शास्त्री आणि साधेपणा हे एक समानार्थी शब्द असल्यासारखं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. त्यांचा मुलगा अनिल शास्त्री हे दिल्लीतल्या सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला गेले होते. तेव्हा ते पंतप्रधानांचे सुपूत्र आहे याची कॉलेजवाल्यांना कल्पना नव्हतीच.

फॉर्ममध्ये त्यांनी वडिलांचा व्यवसाय सरकारी नोकर असा टाकला. वडिलांचं नाव एल.बी. शास्त्री असं टाकलं आणि पत्ता 1, जनपथ असा टाकला. तो पाहून कॉलेज प्रशासनाला शंका आली.

अनिल यांना खोदून खोदून जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ते लालबहादूर शास्त्रीचे सुपूत्र आहेत. तेव्हा कॉलेज प्रशासनाला आश्चर्याचा धक्का बसला. हा किस्सा अनिल शास्त्री यांनी बीबीसीशी बोलताना सांगितला होता.

एका हाकेवर लोकांनी सोडलं एकवेळचं जेवण

1965 च्या युद्धादरम्यान अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी शास्त्रींना धमकी दिली होती की तुम्ही पाकिस्तानविरुद्ध युद्ध थांबवलं नाही तर तुम्हाला जे गहू पाठवतो ते बंद करू. त्यावेळी भारत गव्हाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण नव्हता.

शास्त्रींना ही गोष्ट चांगलीच लागली. कारण साधे असले तरी ते प्रचंड स्वाभिमानी होते. त्यांनी देशवासियांना आव्हान केलं की एक वेळेस जेवू नका. असं केलं तर अमेरिकेने पाठवलेला गहू आपल्याला पुरेल.

अनिल शास्त्री सांगतात, “हे आवाहन करण्याआधी माझी आई ललिता शास्त्री यांना विचारलं आपल्याकडे एक वेळेचा स्वयंपाकच होणार नाही असं काही होऊ शकतं का? मी उद्या देशवासियांना एक वेळेस जेवू नका असं आवाहन करणार आहे.”

लालबहादूर शास्त्री

फोटो स्रोत, Kuldeep Nayyar

“माझी मुलं उपाशी राहू शकतात की नाही हे मला पहायचं होतं. जेव्हा त्यांनी पाहिलं की आम्ही लोक एकवेळेस उपाशी राहू शकतो तेव्हा त्यांनी देशवासियांनाही असं करण्याचा सल्ला दिला,” अनिल पुढे सांगतात.

ऑक्टोबर 1965 मध्ये दसऱ्याच्या दिवशी रामलीला मैदानात जनतेला संबोधित करताना त्यांनी ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा दिली.

ही घोषणा अन्नधान्याच्या तुटवड्याला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांच्या आदरासाठी आणि सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना प्रोत्साहन आणि सन्मान देण्यासाठी होती.

“जे स्वराज्य आपल्याला मिळालं आहे ते आपण कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे ठेवू, म्हणजे कोणी आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर आम्ही त्याचा मुकाबला करू शकू. त्यामुळे जय जवान जय किसान या घोषणेची देशाला अतिशय गरज आहे,” असं ते म्हणाले.

बिहारच्या लोकांना घ्यायला बस स्टॉपवर गेले

एकदा पंतप्रधान शास्त्री यांनी काही लोकांना आपल्या घरी बोलावलं होतं. त्याच दिवशी योगायोगाने परदेशी पाहुण्यांच्या सन्मानार्थ एक समारोहाचं आयोजन करण्यात आलं होतं.

तिथे शास्त्रींचं जाणं अत्यंत गरजेचं होतं. तिथून येता येता उशीर झाला. त्यामुळे लोक निराश होऊन परत गेले.

जेव्हा शास्त्रींना कळलं की लोक त्यांची वाट पाहून नुकतेच निघाले आहेत तेव्हा त्यांनी सचिवांना विचारलं की ते लोक कुठे गेलेत याची कल्पना आहे का? तेव्हा ते म्हणाले की पंतप्रधान निवासाच्या बाहेर असलेल्या बस स्टॉपहून कुठेतरी जाण्याबद्दल बोलत होते.

लालबहादूर शास्त्री

फोटो स्रोत, Lal Bahadur Shastri Memorial

शास्त्री तातडीने बस स्टॉपवर गेले. त्यांचा सचिव म्हणाला की “लोकांना कळेल तेव्हा ते काय म्हणतील?”

“त्या लोकांना आमंत्रित करुनसुद्धा मी भेटलो नाही हे जेव्हा कळेल तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल?” असं उत्तर त्यांनी दिलं. त्यावर शास्त्रींचे सचिव म्हणाले की “मी त्यांना घ्यायला जातो.”

तेव्हा शास्त्री म्हणाले “मी त्यांना स्वत: घ्यायला जातो आणि माफी मागतो.” जेव्हा ते बस स्टॉपवर गेले तेव्हा लोक बसची वाट पाहत होते. शास्त्रींनी त्यांची माफी मागितली आणि आपल्या घरी घेऊन गेले.

लाल बहादूर शास्त्री

फोटो स्रोत, Lal Bahadu Shastri Memorial

1962 मध्ये भारत चीन युद्धानंतर पाकिस्ताननेही भारतावर आक्रमण करायला सुरुवात केली. मात्र लालबहादूर शास्त्री यांनी या हल्ल्याचा खंबीरपणे प्रतिकार केला. मी दिसायला छोट्या चणीचा असलो तरी मनाने खमका आहे असं ते म्हणत असत.

भारतावर कोणी हल्ला केला तर त्याला कडक प्रत्युत्तर देण्यात येईल, असं त्यांनी लाल किल्ल्यावरून जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटलं होतं.

शेवटी संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली होती.

ताश्कंद करार आणि शेवटचे क्षण

लालबहादूर शास्त्री यांच्या संपूर्ण आयुष्यात फारसे वादाचे क्षण आले नाहीत. मात्र त्यांच्या मृत्यूमुळे आजही न सुटलेला वाद निर्माण झाला.

10 जनवरी 1966 ला ताश्कंद येथे पाकिस्तान बरोबर झालेल्या शांतता करारानंतर बारा तासातच 11 जानेवारी 1966 ला त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगण्यात येतं.

वर उल्लेख केल्याप्रमाणे पंतप्रधान पदाची सूत्र हातात घेतल्यावरही त्यांना एकदा हृदयविकाराचा झटका आला होता. यामुळेच की काय त्यांचे आप्तस्वकीय त्यांना कमी काम करण्याचा सल्ला देत असत. मात्र 1964 मध्ये पंतप्रधान पदाची सूत्र हातात घेतल्यावर त्यांचं काम वाढतच गेलं.

भारत पाकिस्तान युद्ध हा शास्त्रींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतला सर्वांत कठीण काळ होता. या दोन देशांमध्ये एप्रिल ते सप्टेंबर 1965 दरम्यान सहा महिने युद्ध सुरू होतं.

युद्ध संपल्यावर चार महिन्यानंतर रशियातील ताश्कंद येथे लाल बहादूर शास्त्री आणि पाकिस्तान कडून अयुब खान शांतता करारासाठी रवाना झाले आणि 10 जानेवारीला दोन देशांमध्ये हा करार झाला.

हा करार झाल्यानंतर शास्त्री अतिशय दबावात होते पाकिस्तानला हाजी पीर आणि तिथवाल वापस दिल्यामुळे भारतात त्यांच्यावर प्रचंड टीका होत होती. इतकंच काय तर त्यांची पत्नी सुद्धा त्यांच्यावर खूपच नाराज होती.

शास्त्री यांचे माहिती अधिकारी आणि ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांनी बीबीसीला या संदर्भात सविस्तरपणे सांगितलं होतं. ते म्हणतात “त्या दिवशी त्यांनी घरी फोन केला. ते म्हणाले अम्माला फोन द्या. ते ते त्यांच्या पत्नीला अम्मा म्हणायचे. त्यांची मोठी मुलगी फोनवर आली आणि म्हणाली की तुम्ही हाजी पीर आणि तिथवाल पाकिस्तानला दिलं. त्यामुळे अम्मा प्रचंड नाराज आहे.”

शास्त्रीजींना हे ऐकून प्रचंड धक्का बसला. ते खोलीतच येरझाऱ्या घालत बसले. नंतर त्यांनी त्यांचे सचिव वेंकटरामन यांना फोन केला आणि भारतातून काय प्रतिक्रिया येत आहेत हे विचारलं.

तेव्हा वेंकट रामन म्हणाले की आतापर्यंत अटलबिहारी वाजपेयी आणि कृष्णा मेनन यांनी तुमच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

ताश्कंद करार

त्यानंतर बारा तासांतच त्यांचा मृत्यू झाला. कुलदीप नय्यर त्यांच्या ‘बियॉन्ड द लाईन्स’ या पुस्तकात या घटनाक्रमाबद्दल सविस्तर माहिती देतात.

ते म्हणतात, “त्या रात्री मी झोपलो होतो. अचानक एका रशियन महिलेने दरवाजा ठोठावला आणि म्हणाली की तुमचे पंतप्रधान मरणासन्न अवस्थेत आहे. मी लगेच त्यांच्या खोलीत गेलो आणि पाहिलं की रशियन पंतप्रधान अलेक्सिकोज गेन वरांडात उभे होते.

त्यांनी मला इशाऱ्याने सांगितलं की शास्त्रीजींचं निधन झालं आहे. त्यांनी पाहिलं की त्यांची चप्पल कार्पेटवर ठेवली होती. जवळच ड्रेसिंग टेबल होतं. तिथे थर्मास खाली पडला होता. तो थर्मास उघडण्याचा प्रयत्न शास्त्रींनी केला होता. खोलीत कोणतीही बेल नव्हती.

शास्त्रींबरोबर आलेल्या भारतीय शिष्टमंडळातील लोकांना लोकांचं असं म्हणणं होतं की त्या रात्री ते अतिशय अस्वस्थ दिसत होते.

त्यांच्या अशा अकस्मात मृत्यूमुळे संशयाचे ढग तयार झाले. त्यांच्या खाण्यात विष मिसळण्याचा संशयही व्यक्त करण्यात आला. त्यांचे कुटुंबीय कायमच याबद्दल प्रश्न उपस्थित करत राहिले.

त्यांचे दोन स्वीय सहाय्यक डॉक्टर आर एन सिंग आणि रामनाथ यांचा वेगवेगळ्या घटनेत मृत्यू झाला. ते दोघेही ताश्कंद येथे शास्त्री यांच्याबरोबर गेले होते. या सहायकांच्या मृत्यूमुळे हा खटला कमजोर झाल्याचं सांगण्यात येतं.

लालबहादूर शास्त्री यांची कारकीर्द अल्पकाळ होती तरी त्यादरम्यान घडलेल्या घटनांनी ती वादळी ठरली आणि शास्त्रींच्या अकस्मात झालेल्या मृत्यूने अनेक प्रश्नांची मालिकाही उभी राहिली.

1966 मध्ये त्यांना भारतरत्न या सर्वौच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

SOURCE : BBC