Home LATEST NEWS ताजी बातमी ‘मी चोर नाही’ म्हणत विजय माल्ल्यांनी नेमके काय सांगितले? भारतात परत येण्याबद्दल...

‘मी चोर नाही’ म्हणत विजय माल्ल्यांनी नेमके काय सांगितले? भारतात परत येण्याबद्दल केलं मोठं वक्तव्य

4
0

Source :- BBC INDIA NEWS

विजय माल्ल्यांनी सोशल मीडियावर मुलाखत शेअर करताना किंगफिशरच्या कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

2 तासांपूर्वी

मद्य व्यावसायिक विजय माल्ल्या पुन्हा एकदा भारतात चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांनी अलीकडेच यूट्यूबर राज शमानीला दिलेल्या एका मुलाखतीत अनेक मोठे दावे केले आहेत.

“मी भारत सोडताना तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांना सांगितलं होतं की, मी लंडनला जात आहे. मला जिनिव्हामध्ये एका बैठकीत सहभागी व्हायचं आहे. मी परत येणार आहे. कृपया बँकांना माझ्यासोबत बसून तोडगा (सेटलमेंट) काढण्यास सांगा,” असं विजय माल्ल्या मुलाखतीत म्हणाले.

अरुण जेटली यांच्यासोबत बसून औपचारिक भेट घेतली, असा दावा कधीच केला नाही, असंही ते म्हणाले. संसदेत झालेल्या भेटीदरम्यान ही सर्व चर्चा झाल्याचं ते म्हणाले.

यापूर्वी 2018 मध्येही माल्ल्यांनी भारत सोडण्यापूर्वी अरुण जेटलींची भेट घेतल्याचा दावा केला होता. मात्र, त्या वेळी अरुण जेटली यांनी हा दावा फेटाळून लावला होता.

सध्या विजय माल्ल्या ब्रिटनमध्ये राहत आहे. 2016 साली भारत सोडल्यानंतर भारतीय तपास यंत्रणा त्यांना परत भारतात आणण्यासाठी ब्रिटनच्या न्यायालयात कायदेशीर लढा देत आहेत.

माल्ल्यांवर आरोप आहे की, त्यांनी किंगफिशर एअरलाइन्स कंपनीसाठी बँकांकडून कर्ज घेतलं आणि ते न फेडताच ते देशाबाहेर निघून गेले.

हे कर्ज सुमारे 10 हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं सांगितलं जातं. किंगफिशर एअरलाइन्स आर्थिक अडचणींमुळे बंद पडली आहे.

या मुलाखतीत माल्ल्या यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची उभारणी कशी झाली याचा किस्सा सांगितला. त्याचबरोबर भारतात परतण्याबाबत आणि त्यांना ‘फरार’ म्हणण्यावरही प्रतिक्रिया दिली आहे.

माल्ल्यांनी ही मुलाखत एक्सवर शेअर केली आणि किंगफिशरच्या कर्मचाऱ्यांची माफीही मागितली आहे.

त्यांनी एक्सवर लिहिलं की, “गेल्या नऊ वर्षांत मी पहिल्यांदाच या पॉडकास्टमध्ये माझं म्हणणं मांडलं आहे. मला किंगफिशर एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांची माफी मागायची आहे. तसेच सत्य आणि तथ्यांसह माहिती स्पष्टपणे मांडायची आहे.”

जेटलींशी भेटीबद्दल आणखी काय म्हणाले?

राज शमानीनं मुलाखतीदरम्यान माल्ल्यांना विचारलं, “तीन मार्च 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयात तुमच्या प्रकरणाची सुनावणी होती आणि तुम्हाला सुप्रीम कोर्टसमोर हजर राहायचं होतं.

एक मार्चला तुम्ही दिल्लीत होता, संसदेत गेला आणि दोन मार्चला तुम्ही देश सोडून जाता. सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्याच्या एक दिवस आधी, हे सर्व योग्य आहे का?”

या प्रश्नाच्या उत्तरात विजय माल्ल्यांनी म्हटलं की, ही सर्व माहिती पूर्णपणे ‘चुकीची’ आहे. ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयात कुठलीही सुनावणी होणार नव्हती आणि मला न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी समन्सही आला नव्हता. मला अशा कोणत्याही सुनावणीची माहिती नाही.”

“मी त्यावेळी तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांना विमानतळावर जाताना ही माहिती दिली होती. त्यानंतर मी दिल्लीहून लंडनला गेलो,” असं माल्ल्यांनी सांगितलं.

मी एफआयए वर्ल्ड काऊन्सिलच्या बैठकीसाठी जिनिव्हाला जात होतो. ही बैठक काही महिन्यांपूर्वी ठरलेली होती. हे मी अर्थमंत्र्यांना यासाठी सांगितलं होतं कारण, मी संसदेतून थेट दिल्ली विमानतळावर गेलो होतो.”

भारतातून जाताना अरुण जेटलींची भेट घेतली होती, असा दावा विजय माल्ल्यांनी केला. (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

यापूर्वीही 2018 मध्ये विजय माल्ल्यांनी भारत सोडण्याआधी अरुण जेटली यांची भेट घेतल्याचा दावा केला होता. ते म्हणाले होते की, “मी भारतातून जिनिव्हाला पूर्वनियोजित बैठकीसाठी गेलो होतो. जाण्यापूर्वी मी अर्थमंत्र्यांची भेट घेतली होती.”

जेटली यांनी ‘फॅक्चुअल सिच्युएशन’ या शीर्षकाने एक फेसबुक पोस्ट लिहिली होती, त्यात माल्ल्या यांच्या दाव्यात कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलं होतं.

जेटली म्हणाले होते, “हे चुकीचं आहे. 2014 पासून मी त्यांना (माल्ल्या) कधीही भेटीची वेळ दिली नाही. त्यामुळे माझी भेट घेण्याचा प्रश्नच येत नाही. ते राज्यसभेचे सदस्य होते आणि ते कधीतरीच सभागृहात येत असत.”

“अशा परिस्थितीत जेव्हा मी सभागृहाचं कामकाज संपवून माझ्या खोलीकडे जात होतो, तेव्हा विशेषाधिकाराचा गैरवापर करत ते माझ्याकडे आले आणि चालता चालता म्हणाले, ‘मी कर्ज फेडण्यासाठी एक ऑफर देत आहे’.

मी त्यांना सांगितलं की, माझ्याशी बोलून काही उपयोग नाही, तुम्ही बँकेला ऑफर द्यायला पाहिजे. त्यांच्या हातातील कागद घेण्यासही मी नकार दिला.”

ग्राफिक्स

आता राज शमानीला दिलेल्या मुलाखतीत विजय माल्ल्यांनी या घटनेवरही भाष्य केलं आहे.

माल्ल्या म्हणाले, “जेटलींशी झालेल्या भेटीची गोष्ट जशी प्रसारमाध्यमांत पसरली, तसं लोकांनी जेटलींना प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यांनी माझ्याशी झालेल्या भेटीचा दावा फेटाळून लावला.

काँग्रेसच्या एका खासदारांनी आम्हाला पाहिलं होतं आणि त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, मी दोघांना एकत्र पाहिलं होतं. त्यानंतर जेटली आपलं पूर्वीचं विधान मागं घेत, होय मी त्यांना भेटलो होतो, पण ही भेट येता-जाता झाली होती, असं म्हटलं होतं.”

“मी असं कधीही म्हटलेलं नाही की, मी जेटलींच्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांच्या समोर बसून चहा घेत चर्चा केली. मी फक्त एवढंच म्हणालो होतो की, मी निघताना अर्थमंत्र्यांशी बोललो होतो की, मी लंडनला जात आहे.

मला जिनिव्हामध्ये एका बैठकीला हजर राहायचं आहे. मी परत येईन. कृपया बँकांना माझ्यासोबत बसून तोडगा काढण्यास (सेटलमेंट) सांगा.”

‘भारतात परतण्याबद्दल काय म्हणाले?’

विजय माल्ल्यांना भारतातील पासपोर्ट रद्द करण्याबद्दल आणि त्याविरुद्ध लढा न देण्याबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी म्हटलं की, “एक व्यक्ती एकाच वेळी किती आघाड्यांवर लढू शकतो? माझ्याकडे करण्यासाठी पुरेशा गोष्टी होत्या आणि मी माझ्या कायदेशीर लढाईंवर लक्ष केंद्रित करू इच्छित होतो.”

“भारतात परत न आल्यामुळे गोष्टी आणखी बिघडल्या असं तुम्हाला वाटत नाही का?” असा प्रश्नही माल्ल्यांना विचारण्यात आला.

या प्रश्नावर माल्ल्यांनी उत्तर दिलं की, “जर मला न्याय्य खटला (फेअर ट्रायल) आणि सन्मानपूर्वक राहण्याची हमी दिली गेली, तर मी भारतात परतण्याचा गंभीरपणे विचार करू शकतो.

पण, तुम्हाला हेही माहीत असावं की, अशा काही इतर व्यक्तीही आहेत ज्यांना भारत सरकार ब्रिटनमधून प्रत्यार्पणासाठी लक्ष्य करत आहे.”

विजय माल्ल्यांनी राज शमानीला दिलेल्या मुलाखतीत ईडी आणि सीबीआयच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

विजय माल्ल्या म्हणाले की, अशी अनेक उदाहरण आहेत. कोणाचंही नाव न घेता ते म्हणाले, “एका प्रकरणात उच्च न्यायालयानं निर्णय दिला की, भारताने प्रत्यर्पणासाठी ज्या अटी ठेवल्या आहे, ते नियमांचे उल्लंघन करतात.

त्यामुळे प्रत्यर्पण होऊ शकत नाही. ही याचिका कोणत्याही खटल्याशिवाय दीर्घकालीन प्रत्यर्पणासाठी होती. अशी अनेक उदाहरणं आहेत.”

माल्ल्या यांना विचारण्यात आलं की, जर त्यांना भारताला प्रत्यर्पित केलं गेलं तर त्यांच्या अटी काय असतील?

त्यावर ते म्हणाले की, “हा वकिलांच्या चर्चेचा विषय आहे. पण सीबीआय आणि ईडी ज्या पद्धतीनं काम करतात आणि त्यांचा जो ट्रॅक रेकॉर्ड आहे, त्यावर फारसा विश्वास नाही.”

”फरार’ ठरवण्यावरून काय म्हटलं?

राज शमानीनं म्हटलं की, भारतात अनेक उद्योगपती आहेत ज्यांनी बँकांचे कर्ज फेडलेले नाही. तरी ते भारतात राहून लढाई लढत आहेत. त्यामुळे लोक त्यांना ‘फरार’ किंवा ‘चोर’ म्हणत नाहीत. अशी अनेक उदाहरणं आहेत.

यावर त्यांनी उत्तर दिलं की, “लोक मला भारतात गेलो नाही म्हणून फरार म्हणत असतील, तर काही हरकत नाही. मी तिथून पळालो नाही. मी माझ्या पूर्वनियोजित प्रवासासाठी भारत सोडलं होतं. मी परत आलो नाही, कारण मला त्यामागे योग्य कारणं दिसली.”

“जर तुम्हाला मला फरार म्हणायचं असेल तर म्हणा. पण ‘चोर’ हा शब्द कुठून आला? मी चोरी केली कुठे?”

ग्राफिक्स

मुलाखतीदरम्यान विजय माल्ल्यांना भारतातून पळून जाण्याबाबत प्रश्न विचारला, त्यावर ते म्हणाले की, “पळून जाणं किंवा फरार होण्याचं पूर्ण नरेटिव्ह अशा लोकांकडून येत आहे, ज्यांना वस्तुस्थिती माहीत नाही.”

“मी 1988 मध्ये इंग्लंडला आलो. 1992 मध्ये मला आयएलआर मिळाला. गेल्या 32 वर्षांपासून मी ब्रिटनचा कायमचा रहिवासी आहे,” असं त्यांनी सांगितलं.

ब्रिटिश सरकारनुसार, आयएलआर म्हणजे ‘इनडेफिनिट लिव्ह टू रिमेन’. यानुसार, व्यक्तीस इच्छेनुसार ब्रिटनमध्ये राहणं, काम करणं आणि शिक्षण घेण्याचा अधिकार मिळतो. याचा उपयोग ब्रिटनच्या नागरिकत्वासाठी अर्ज करतानाही होऊ शकतो.

“मला भारतात फक्त 180 दिवस राहण्याची परवानगी मिळाली होती. कारण 1988 पासून माझ्याकडं अनिवासी दर्जा आहे. त्यामुळे मी नेहमी ये-जा करत होतो,” असंही ते म्हणाले.

‘आरसीबीची मालकी कशी घेतली?’

विजय माल्ल्या म्हणाले की, त्यांनी रॉयल चॅलेंज व्हिस्की ब्रँडची खरेदी केली, तेव्हा तो पुढे नेण्याचा विचार ते करत होते. त्यासाठी मार्केटिंगची गरज होती आणि त्याच वेळी आयपीएलची सुरुवात झाली.

“मी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचा प्रतिनिधी म्हणून बीसीसीआयच्या समितीसमोर बसलो होतो आणि ललित मोदींच्या आयपीएलसंदर्भातील कल्पनेनं मला खूप प्रभावित केलं होतं.”

“मला एका दिवशी फोन आला की, संघांची बोली लावली जाणार आहे. तुम्ही खरेदी करणार आहात का? मी विचार केला की, क्रिकेटला धर्म समजल्या जाणाऱ्या देशात माझा ब्रँड प्रमोट करण्यासाठी क्रिकेटपेक्षा चांगला मार्ग कोणता असेल?”

विजय माल्ल्या असंही म्हणाले की, ते दोन संघ खरेदी करू इच्छित होते. “मी थोडासा लोभी झालो होतो. मी एक संघ किंगफिशरसाठी आणि एक रॉयल चॅलेंज व्हिस्की ब्रँडसाठी खरेदी करू इच्छित होतो.”

पण, त्यांनी मला नाही म्हटलं, तुम्ही दोन संघ विकत घेऊ शकत नाही. तुम्ही फक्त एकच संघ विकत घेऊ शकता, असं सांगितलं”

ललित मोदीच्या (उजवीकडे) आयपीएलच्या कल्पनेनं खूप प्रभावित झालो होतो, असं विजय माल्ल्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, STR/AFP via Getty

माल्ल्या असंही म्हणाले की, बोली लावताना त्यांनी तीन फ्रँचायझींसाठी बोली लावली होती. “मी आयपीएल संघाच्या माध्यमातून माझे ब्रँड्स प्रमोट करण्यासाठी जास्त उत्सुक होतो. म्हणून मी तीन फ्रँचायझीसाठी बोली लावली.”

“मी मुंबईसाठी खूप कमी फरकानं बोली हरलो. मी तीन फ्रँचायझीसाठी सर्वाधिक बोली लावणारा होतो. पण मला एका संघाची निवड करावी लागली. म्हणून मी बंगळुरूची निवड केली.

मग नैसर्गिकपणे संघाचं नाव ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ ठरलं, कारण व्हिस्कीचं नाव ‘रॉयल चॅलेंज’ होतं. अशा प्रकारे आरसीबीचा जन्म झाला.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC