Source :- BBC INDIA NEWS

मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावर म्हणजेच मुंबई कोस्टल रोडवर हंगेरियन तंत्रज्ञानावर आधारित संगीत रस्त्याची संकल्पना साकारण्यात आली आहे.
साडेसात लाख रुपये खर्च करून ही संकल्पना साकारण्यात आली आहे. या मेलडी रोडचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 11 फेब्रुवारी 2026 रोजी लोकार्पण करण्यात आले.
या संकल्पनेवर काही लोक आनंद व्यक्त करत आहेत. तर काही मुंबईकर, सामाजिक कार्यकर्ते आणि वाहतूक तज्ज्ञ याची खरंच गरजेची होती का असा सवाल करत आहेत.
मुंबईत रस्ते, पाणी, आरोग्य अशा समस्या मुंबईकरांना भेडसावत असताना मूलभूत सोयी-सुविधांकडे प्रशासनाने लक्ष देण्याऐवजी अशा संकल्पनांवर जनतेचा पैसा खर्च केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
“साकारण्यात आलेली संगीत रस्त्याची संकल्पना वाहनधारकांना आनंद देणारी आहे. ही अभिनव संकल्पना पुढेही राबविण्याचा मानस आहे”, असे उद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमावेळी काढले.
मुंबईत भारतातील हा पहिलाच प्रयोग
मुंबईत नरिमन पॉईंटकडून कोस्टल रोडने जाताना वरळीकडे जाणाऱ्या उत्तर मार्गिकेवर संगीत पट्टे बसविण्यात आले आहेत.
या पट्ट्यांवरून ताशी 60 ते 80 किलोमीटर वेगाने वाहन चालविल्यास ‘जय हो’ या गीताची धून ऐकू येते. या रस्त्याच्या पृष्ठभागावर ठराविक अंतरावर आणि विशिष्ट आकारात पट्टे बसविण्यात आले आहेत.
वाहन या पट्ट्यांवरून गेल्यावर चाकांच्या घर्षणातून निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरींमुळे ‘जय हो’ गाण्याची धून प्रवाशांना ऐकू येते. आतापर्यंत हंगेरी, जपान, दक्षिण कोरिया आणि संयुक्त अरब अमिराती येथे असे प्रयोग करण्यात आले आहेत. भारतातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे.

हा जगातील पाचवा आणि भारतातील पहिलाच प्रयोग असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला आहे.
पण मुंबईकर यावर नाराजी व्यक्त करत आहेत.
या मेलडी रोड संदर्भात मुंबईकरांना काय वाटते हे जाणून घेण्यासाठी आम्ही मुंबईच्या विविध भागात फिरलो. मुंबईकरांना या रोडबद्दल विचारले असता त्यांच्यात नाराजी दिसून आली.
सांताक्रूज येथे राहणाऱ्या दीपिका पवार बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या, “आमच्या भागात रस्ते, पाणी, गटारे हे प्रश्न वर्षानुवर्षे आहेत. प्रशासनाने आधी याकडे लक्ष द्यावे. नंतर मेलडी रोड बनवावा. इतका पैसा तिथे खर्च करण्यापेक्षा आमच्या समस्या सोडवाव्यात.”

मुंबईकर नितेश शिंदे म्हणाले, “आम्ही करदाते आहोत. अशा संकल्पना राबवण्यापूर्वी आम्हाला विचारले का? हा रस्ता कोणासाठी आणि त्याचा फायदा काय? मुळात कुठला मुंबईकर 70 ते 80 च्या वेगाने मुंबईत गाडी चालवून ते गाणे ऐकेल? आमचे मूलभूत प्रश्न न सोडवता कोट्यवधी रुपये वाया घालवले जात आहेत.
कलिना येथील मुंबईकर मेहुल जाधव म्हणाले, “या संकल्पनेची मुंबईत आवश्यकता नव्हती. गरीब मुंबईकर आधीच समस्यांनी त्रस्त आहेत. त्यांच्यावर हा अन्याय आहे. अशा संकल्पनांबाबत प्रशासनाने पुनर्विचार करावा, अशी आमची मागणी आहे.”
या संकल्पनेतील त्रुटी आणि काळजीचे आवाहन
कोस्टल रोडवर 500 मीटरपर्यंत लावलेल्या संगीत पट्ट्यांमुळे वाहनचालकांना या नवीन संकल्पनेचा अनुभव घेता येतो. पण या संकल्पनेत काही त्रुटी आहेत आणि ती काळजीपूर्वक हाताळली पाहिजे, असे वाहतूक अभ्यासक सांगतात.

वाहतूक तज्ज्ञ विवेक पै बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, ठजगातील विविध प्रयोग मुंबईत येऊ शकतात. याची तातडीची गरज नव्हती. मात्र इतर देशांतील प्रयोग पाहून पालिकेने येथे हा उपक्रम राबवला असावा. परदेशातील आणि आपल्या येथील परिस्थिती वेगळी आहे.ठ
ते पुढे म्हणाले, ठपरदेशात सलग आणि लांब प्रवासात आजूबाजूला काही नसल्याने वाहनचालकांना जागृत ठेवण्यासाठी अशा संकल्पना राबविल्या जातात. कोस्टल रोडवर तितका लांब प्रवास नाही. सध्या हे पट्टे एका बाजूला बसवले आहेत. त्यामुळे काही वाहनचालक मुद्दाम त्या बाजूने वाहन चालवू शकतात. अशा वेळी इतरांनी काळजी घेणे आवश्यक आहे. गाडी चालवताना अचानक आवाज आल्याने लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. योग्य वापर झाला तर ही संकल्पना ठीक, अन्यथा ती धोकादायक ठरू शकते.ठ
मूलभूत प्रश्न असताना प्रतिमानिर्मितीचा भाग?
मुंबईत पाणी, आरोग्य यांसारख्या अनेक समस्या आहेत.
परदेशी संकल्पना राबवून प्रशासन चांगले काम करत असल्याचा आभास निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का, याबाबत आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतली.
अशा संकल्पनांपेक्षा मूलभूत समस्यांकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, असे सामाजिक कार्यकर्ते सांगतात.

मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, “आपल्याकडे वाहतुकीचे नियम आणि परिस्थिती वेगळी आहे.
अशा संकल्पना राबवणे धोकादायक ठरू शकते. सर्व प्रश्न बाजूला ठेवून परदेशी पद्धती राबवण्याचा हा प्रयत्न आहे का, असा प्रश्न निर्माण होतो.”
“सरकार आणि प्रशासन प्रत्येक प्रकल्पामागे काही भूमिका मांडत असते. मात्र एखाद्या प्रकल्पाची खरी आवश्यकता किती आहे याचा विचार पालिकेने आणि राज्यकर्त्यांनी करायला हवा.”
यापुढेही संगीत मार्ग ही संकल्पना राबविण्याचा मानस
11 फेब्रुवारी रोजी लोकार्पणदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई किनारी रस्त्यावरील पहिल्या टप्प्यात 500 मीटर अंतरावर ही संकल्पना राबविण्यात आली आहे.
पुढेही संगीत मार्ग ही संकल्पना राबविण्याचा मानस आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “समृद्धी महामार्गावरही प्रायोगिक तत्त्वावर ही संकल्पना राबविण्याचा विचार करू.”
मुंबई किनारी रस्त्यावर साकारलेला संगीत मार्ग मुंबईकरांच्या मनात देशभक्ती जागृत करणारा आहे. हा भारतातील पहिलाच संगीत रस्ता असल्याचेही त्यांनी सांगितले.
मेलडी रोड म्हणजे काय? हे तंत्रज्ञान कसे काम करते?
मेलडी रोड किंवा संगीत रस्ता ही अशी संकल्पना आहे की रस्त्यावर विशिष्ट पद्धतीने पट्टे तयार केले जातात. वाहन ठराविक वेगाने त्या पट्ट्यांवरून गेल्यास चाकांच्या कंपनातून एक विशिष्ट धून ऐकू येते. म्हणजे रस्ताच जणू वाद्याप्रमाणे काम करतो.
ही धून वाहनातील स्पीकरमधून येत नाही. ती चाक आणि रस्त्याच्या पृष्ठभागातील घर्षणातून निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरींमुळे ऐकू येते.

या हंगेरियन तंत्रज्ञानात रस्त्यावर ठराविक अंतरावर आणि ठराविक खोलीचे छोटे पट्टे किंवा खाचा तयार केल्या जातात.
वाहन ठराविक वेगाने या खाचांवरून गेले की प्रत्येक खाचेमुळे एक कंपन निर्माण होते. त्या कंपनांची वारंवारता म्हणजेच प्रति सेकंद निर्माण होणाऱ्या कंपनांची संख्या बदलली की वेगवेगळे सूर तयार होतात.
खाचांमधील अंतर जितके अचूक, तितकी धून स्पष्ट ऐकू येते. जर वाहनाचा वेग जास्त किंवा कमी असेल तर धून योग्यप्रकारे ऐकू येत नाही. त्यामुळे चालकाने ठराविक वेग राखणे अपेक्षित असते.
हे तंत्रज्ञान कोणत्या उद्देशाने वापरले जाते?
जगातील काही देशांमध्ये ही संकल्पना प्रामुख्याने दोन कारणांसाठी वापरली जाते. चालकांना झोप येऊ नये किंवा लक्ष विचलित होऊ नये म्हणून. दुसरे म्हणजे ठराविक वेग पाळण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्याचा वापर केला जातो.

लांब आणि सरळ रस्त्यांवर चालकांना कंटाळा किंवा झोप येऊ शकते. अशावेळी अशा धून चालकाला सतर्क ठेवण्यास मदत करतात.
मेलडी रोड ही सजावटीची किंवा केवळ आकर्षणासाठीची कल्पना नसून, ती रस्ते सुरक्षेशी संबंधित तंत्रज्ञान आहे. मात्र ती कितपत उपयुक्त ठरेल हे स्थानिक वाहतूक परिस्थिती, रस्त्याची रचना आणि वाहनचालकांचे वर्तन यावर अवलंबून असते असे वाहतूक तज्ज्ञ व अभ्यासक सांगतात.
लोकांच्या आणि अभ्यासकांच्या या मतांवर प्रशासनानं अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. तशाप्रकारे भूमिका स्पष्ट होताच तीही येथे अपडेट करण्यात येईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC



