Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
एका चिनी महिलेला अमेरिकेत धोकादायक बुरशीची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याचा दावा अमेरिकन तपास संस्था फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफबीआय) संचालक काश पटेल यांनी केला आहे.
एक्स या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये काश पटेल यांनी सांगितलं, “या चिनी महिला नागरिकाचे नाव युनकिंग झियान आहे.
युनकिंग ही मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये काम करते आणि तिथूनच तिने संशोधनासाठी धोकादायक असलेल्या ‘फ्यूजेरियम ग्रेमिनीअरम’ या बुरशीची तस्करी केली.”
अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात सांगितलं आहे की, ही बुरशी संभाव्यतः ‘अॅग्रो टेररिझमचे शस्त्र’ (कृषी दहशतवाद) ठरू शकते.
या बुरशीमुळे ‘हेड ब्लाइट’ नावाचा रोग होतो. ही बुरशी गहू, बार्ली (जव), मका आणि तांदळाच्या पिकांमध्ये आढळते.
निवेदनात म्हटलं आहे की, या बुरशीमुळं दरवर्षी जगभरात अब्जावधी डॉलर्सचं आर्थिक नुकसान होतं.

काश पटेल म्हणाले की, याप्रकरणी झियानचा बॉयफ्रेंड झुनयोंग लिऊवरही आरोप ठेवण्यात आले आहेत.
त्यांनी सांगितलं की, लिऊ सुरुवातीला खोटं बोलला, पण नंतर त्यानं मान्य केलं की, त्यानं फ्यूजेरियम ग्रेमिनीअरम ही बुरशी तस्करी करून डेट्रॉयट मेट्रोपॉलिटन विमानतळाच्या मार्गे अमेरिकेत आणली, जेणेकरून तो मिशिगन युनिव्हर्सिटीत संशोधन करू शकेल.

फोटो स्रोत, Reuters
यानंतर या दोन्ही चिनी नागरिकांवर कट रचणं, अमेरिकेत तस्करी करणं, खोटे जबाब देण्याचा आणि व्हिसा फसवणुकीशी संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तर, अमेरिकेच्या न्याय मंत्रालयानुसार, या दोन्ही आरोपींविरुद्ध मिळालेल्या तक्रारीनुसार, झियानला चीनमध्ये तिच्या रोगजनकांवर (पॅथोजेन) काम करण्यासाठी चीन सरकारकडून निधी मिळाला होता.

काश पटेल यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये फ्युजेरियम ग्रेमिनीअरमला ‘अॅग्रो टेररिझम एजंट’, म्हणजेच कृषी दहशतवादाचे शस्त्र, म्हटलं आहे.
अॅग्रो टेररिझम हा कृषीशी संबंधित गुन्ह्यांचा, म्हणजेच अॅग्रो क्राइमचा एक भाग आहे. तरीही या दोन्हीमध्ये मोठा फरकही आहे.
याला एखाद्या लोकसंख्येची अर्थव्यवस्था आणि अन्नपुरवठा बाधित किंवा विस्कळीत करण्याच्या उद्देशानं त्यांच्या पिकांवर किंवा पशुधनावर ‘हल्ला’ केला जातो, असं समजू शकतो.

फोटो स्रोत, Reuters
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनसाठी (डीआरडीओ) 2020 मध्ये शिवनारायण दत्ता, वनलालमुआका आणि संजय कुमार द्विवेदी यांनी संयुक्तपणे एक अभ्यास केला होता.
त्यानुसार, “शेती नष्ट करण्याच्या हेतूने जैविक घटकांचा जाणूनबुजून वापर करणे याला अॅग्रो टेररिझम म्हणतात. याचा वापर एखाद्या कृषीआधारित अर्थव्यवस्थेच्या सामाजिक-आर्थिक रचनेला गंभीरपणे अस्थिर करण्यासाठी केला जाऊ शकतो. विशेषतः अन्नपिके, कृषी-आधारित उद्योग यांना लक्ष्य करणे.”
“अशा प्रकारचे हल्ले गुप्त असतात, पण ज्या देशांची अर्थव्यवस्था थेट कृषी क्षेत्रावर अवलंबून असते. त्यांच्यासाठी ते अत्यंत विनाशकारी ठरू शकतात.”
अशा प्रकारच्या हल्ल्यात हानिकारक बॅक्टेरिया (जीवाणू) किंवा व्हायरसच्या (विषाणू) माध्यमातून शेतीवर हल्ला केला जातो, ज्यामुळे शेती उत्पादन नष्ट होते आणि पर्यावरणाचेही नुकसान होते.

जैविक अस्त्रांनी होणारी युद्धे नवीन नाहीत.
अल्जेरियाच्या मॉस्टेजनम युनिव्हर्सिटीत शेतीशी संबंधित गुन्ह्यांवर (अॅग्री काइम) एक अभ्यास झाला. त्यानुसार, ‘जैविक दहशतवाद’ (बायोलॉजिकल टेररिझम) हा शब्द 19व्या शतकात पाश्चात्य देशांमध्ये वापरला जात होता.

फोटो स्रोत, Getty Images
याच अभ्यासात म्हटलं आहे की, दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनीने कोलोरॅडो पोटॅटो बीटल (कीटक) वापरून ब्रिटनच्या बटाटा पिकाला नष्ट करण्याची योजना आखली होती.
काही तज्ज्ञांच्या मते, इंग्लंडमध्ये या कीटकांच्या उपस्थितीमुळे असा पुरावा मिळतो की, 1943 मध्ये लहान प्रमाणात हा हल्ला झाला असावा.
कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ देवेंद्र शर्मा यांचं म्हणणं आहे की, आत्तापर्यंत जगभरात समोर आलेल्या प्रकरणांमध्ये प्राण्यांवर अशा हल्ल्यांचे प्रमाण अधिक दिसून आले आहे. ते म्हणतात, “अशा हल्ल्यांनंतर प्राण्यांची उत्पादन क्षमता एकदम शून्यावर येते.”

काश पटेल आणि अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाच्या निवेदनांमध्ये म्हटलं आहे की, ज्या बुरशीच्या तस्करीच्या आरोपाखाली चिनी नागरिकाला अटक करण्यात आली आहे, त्यामुळे केवळ प्राण्यांनाच नव्हे तर माणसांमध्येही गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकते.

फोटो स्रोत, Getty Images
तसंच, ही बुरशी दरवर्षी जगभरात अब्जवाधी डॉलर्सच्या आर्थिक नुकसानीचेही कारण ठरते.
कृषी विषयांचे तज्ज्ञ देवेंद्र शर्मा म्हणतात की, हा हल्ला पाहायला जरी कमी स्तराचा किंवा खालच्या पातळीवरचा वाटत असला तरी त्याचा परिणाम मोठा आणि गंभीर आहे.
ते म्हणतात, “हा अन्नसुरक्षेवर हल्ला करण्याचा एक सोपा मार्ग आहे, जो एखाद्या देशाच्या उत्पादन क्षमतेवर अत्यंत वाईट परिणाम करू शकतो.”

भारत हा एक कृषीप्रधान देश आहे, जिथे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. गहू, तांदूळ, सुका मेवा, डाळी, ऊस यासह अनेक धान्ये व भाजीपाला यांचे सर्वाधिक उत्पादन होते, जे परदेशातही निर्यात केले जाते.
सरकारी आकडेवारीनुसार, भारतीय कृषी क्षेत्र सुमारे 42.3 टक्के लोकसंख्येला उदरनिर्वाहाचे साधन पुरवते आणि देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) त्याचा वाटा सुमारे 20 टक्के आहे.
अशा परिस्थितीत फंगस, विषाणू किंवा बॅक्टेरियाचे पिकांवर किंवा प्राण्यांवर होणारे हल्ले भारतासाठी कितपत धोकादायक ठरू शकतात?

फोटो स्रोत, Getty Images
देवेंद्र शर्मा म्हणतात, “भारतामध्ये सध्या 173 एलियन इनवेजिव्ह प्रजाती आहेत. इनवेजिव्ह प्रजाती अशा असतात ज्या एखाद्या देशात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. पण त्या जर आपल्या देशात आल्या तर मोठा धोका निर्माण होतो. या प्रजाती इतक्या झपाट्याने पसरतात की त्यांना नियंत्रित करणं कठीण होऊन जातं.”
याचं उदाहरण देत ते म्हणतात, “अमेरिकेतून गहू आयात करताना त्यासोबत लँटाना कॅमारा या वनस्पतीने देखील प्रवेश केला. आज संपूर्ण देशात ही वनस्पती पसरली आहे, ज्यामुळे भारताला आर्थिक नुकसान होत आहे आणि यावर नियंत्रण ठेवण्यासाठीही मोठा खर्च करावा लागतो.”
लँटाना कॅमारा ही एक खोडयुक्त झुडूप असलेली वनस्पती आहे, जी भारतीय जंगलांसाठी धोकादायक ठरली आहे.
देवेंद्र शर्मा म्हणतात की, हे बॅक्टेरिया किंवा बुरशी जगातील कोणत्याही देशातून आपल्या देशात प्रवेश करू शकतात. आपल्याला फक्त हे पाहायचं आहे की, ती आपल्या व्यवस्थेमध्ये प्रवेश करू नयेत.

अलीकडे भारतातून अमेरिकाला पाठवलेल्या सुमारे 5 लाख डॉलर्सच्या आंब्यांना नष्ट करावं लागलं. त्या आंब्यांमध्ये कीटक/कीड नष्ट करण्याच्या प्रक्रियेनंतरची आवश्यक कागदपत्रं अपूर्ण होती, असं कारण त्यांनी दिलं होतं.
याच घटनेचं उदाहरण देताना देवेंद्र शर्मा म्हणतात, “आपली लोकसंख्या 140 कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे देशाची अन्नसुरक्षा खूप महत्त्वाची आहे. आपल्याकडे अशी वृत्ती आहे की, कीड लागली तरी काही फरक पडत नाही, पण अमेरिका मात्र आंब्यामध्ये एकही कीड सापडली की देशात त्यांना येऊच देत नाही.”

फोटो स्रोत, Getty Images
डीआरडीओच्या अभ्यासात असं म्हटलं आहे की, ज्या देशांकडे कडक देखरेख व्यवस्था असते आणि जे रोगजनक पटकन ओळखून त्यावर नियंत्रण ठेवू शकतात, अशा देशांवर हल्ला होण्याची शक्यता कमी असते.
देवेंद्र शर्मा यांचा मते, यासाठी सॅनिटरी आणि साइटोसॅनिटरी नियमांचे कडक पालन करणे आवश्यक आहे. याला एसपीएस नियम म्हणतात.
जागतिक व्यापार संघटनेने (डब्ल्यूटीओ) देशांना सुरक्षित अन्नपदार्थ, प्राणी व वनस्पतींच्या कीटकांपासून संरक्षण देण्यासाठी हे नियम तयार केले होते.
देवेंद्र शर्मा म्हणतात की, भारताला विमानतळांवरही निगराणी वाढवावी लागेल, जेणेकरून कोणताही बॅक्टेरिया किंवा व्हायरस देशात येऊन मोठं रूप धारण करू नये.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC